बेल, धोतरा आणि शिव :संतुलनाच्या तत्त्वज्ञानाचा वैज्ञानिक वेध
- smsrushtidnyan
- 20 hours ago
- 4 min read
डॉ. दिपेश रामदास चिकणे
महाशिवरात्र हा भारतीय संस्कृतीतील केवळ धार्मिक उत्सव नसून, तो तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय दर्शविणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदर्भ आहे. शिवतत्त्व हे विनाशाचे नव्हे, तर रूपांतरण, संतुलन आणि चेतनेच्या उत्क्रांतीचे प्रतीक मानले जाते. या लेखात महाशिव रात्र, शिव पूजेत वा परल्या जाणाऱ्या बेल (Aegle marmelos) आणि धोतरा (Datura spp.) या परस्परविरोधी वनस्पतींच्या माध्यमातून संतुलनाची संकल्पना उलगडण्यात आली आहे.

बेल ही सात्त्विक शुद्धता, आरोग्य आणि पर्या वरणीय लाभ दर्शवते, तर धोतरा विषारी असूनही योग्य मात्रेत औषधी ठरणारी तामसिक शक्ती सूचित करते. आयुर्वेद, आधुनिक फार्माकॉलॉजी आणि पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने या वनस्पतींचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तसेच उपवास, जागरण आणि ध्यान या परंपरांचा ऑटोफॅजी, न्यूरोसायन्स आणि क्रोनोबायोलॉजीशी असलेला वैज्ञानिक संबंध अधोरेखित केला आहे. निष्कर्षतः, महाशिवरात्र ही अंधश्रद्धेचा नव्हे, तर प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक विवेक, संयम आणि होमियोस्टॅसिसच्या तत्त्वांचा उत्सव असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत अर्थपूर्ण, गूढ आणि तत्त्वज्ञानाने परिपूर्ण उत्सव आहे. हा सण केवळ धार्मिक विधी, उपवास किंवा जागरणापुरता मर्यादित नसून, तो मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचा, आत्मसंयमाचा आणि निसर्गाशी असलेल्या गूढ नात्याचा उत्सव आहे. शिव या संकल्पनेचा अर्थ विनाश नव्हे, तर जुन्याचे रूपांतर करून नव्याची निर्मिती करणारी चेतना असा आहे. महाशिवरात्र ही रात्र अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे, असंतुलनातून समतोलाकडे आणि बाह्य जगातून अंतर्मुखतेकडे जाण्याचा प्रतीकात्मक प्रवास दर्शवते. शिवतत्त्व समजून घेताना लक्षात येते की शिव हे कोणत्याही एका गुणाचे प्रतिनिधी नाहीत; ते सात्त्विक, राजस आणि तामसिक गुणांचे संतुलन साधतात. त्यामुळे शिवपूजेत वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये विरोधाभास दिसून येतो.

एकीकडे बेल (Aegle marmelos) या पवित्र, औषधी गुणांनी परिपूर्ण वनस्पतीचा वापर केला जातो, तर दुसरीकडे अत्यंत विषारी मानली जाणारी धोतरा (Datura spp.) ही वनस्पतीही शिवांना अर्पण केली जाते. या विरोधाभासातून जीवनातील संतुलन, विषाचा योग्य नियमन आणि संयम या शिकवणुकीवर प्रकाश पडतो. महाशिवरात्र या आध्यात्मिक पर्वाचा स्वरूप आत्मबोध, अंतर्मुखता आणि तत्त्वज्ञानाशी निगडित आहे. उपनिषदकालीन विचारांमध्ये शिवतत्त्व हे आत्मतत्त्वाशी समरूप मानले गेले आहे.
नमः शिवाय शांताय कारणत्रय हेतवे।
निवेदयामि चात्मानं त्वं गतिः परमेश्वर॥

या श्लोकातून शिवाला सर्व कारणांचे मूळ आणि परम शांतीचे अधिष्ठान मानले गेले आहे. या तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिवपूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींवरही स्पष्ट दिसून येतो. बेल (Aegle marmelos) या वनस्पतीचा उल्लेख वैदिक आणि उत्तरवैदिक साहित्यात आढळतो. आयुर्वेदात बेलला ‘दीपन’, ‘पाचन’ आणि ‘संग्राही’ गुणांनी युक्त मानले गेले आहे. चरकसंहितेत अतिसार आणि आमांशाच्या उपचारात बेलाचा वापर वर्णन केला आहे, तर सुश्रुतसंहितेत पचनसंस्थेशी संबंधित विकारांमध्ये बेलचा उल्लेख आढळतो. पौराणिकदृष्ट्या बेलपत्राचे त्रिदल स्वरूप त्रिगुणांचे सत्त्व, रज आणि तम प्रतीक आहे, तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचेही द्योतक मानले जाते.
बिल्वपत्रं त्रिदलं देवि त्रिगुणं पापनाशनम् हा श्लोक बेलपत्राच्या आध्यात्मिक महत्त्वास अधोरेखित करतो. आधुनिक वैज्ञानिक संशोधनानुसार बेलाच्या विविध भागांमध्ये टॅनिन्स, फ्लॅव्होनॉइड्स, फिनॉलिक संयुगे आणि कॅरोटेनॉइड्स आढळतात. अनेक अभ्यासांमध्ये बेलमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीमायक्रोबियल, अँटीडायबेटिक आणि हेपॅटोप्रोटेक्टिव्ह क्रिया असल्याचे निदर्शनास आले आहे. काही अभ्यासांमध्ये बेलपत्रातील अर्काने ग्राम-पॉझिटिव्ह आणि ग्राम-निगेटिव्ह बॅक्टेरियांवर प्रतिबंधक परिणाम दर्शविल्याचे आढळले आहे. त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, पर्यावरणीय स्वच्छता आणि सूक्ष्मजीव नियंत्रणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे बेल हे अध्यात्म आणि पर्यावरणशास्त्र यांमधील दुवा म्हणून पाहता येते.

धोतरा (Datura metel, Datura stramonium) ही वनस्पती भारतीय आयुर्वेद आणि लोकवैद्यकात प्राचीन काळापासून परिचित आहे. आयुर्वेदात धोतऱ्याला ‘उपविष’ या वर्गात स्थान दिले गेले आहे, म्हणजेच ती विषारी असली तरी योग्य प्रक्रियेनंतर आणि योग्य मात्रेत औषधी ठरते. पौराणिक कथांमध्ये धोतरा समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या विषाशी संबंधित मानली जाते आणि शिवांना अर्पण केली जाते.
धत्तूरं फलपुष्पैश्च महादेवाय समर्पयेत् हा श्लोक या संकल्पनेचे द्योतक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून धोतरा ही फार्माकॉलॉजिकल दृष्ट्या महत्त्वाची वनस्पती आहे. धोतऱ्यात Atropine, Scopolamine आणि Hyoscyamine या ट्रोपेन अल्कलॉइड्सचा पाया आहे, जे मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करतात. चुकीच्या मात्रेत हे संयुगे प्राण घातक ठरू शकतात; मात्र योग्य प्रमाणात ते औषध म्हणून उपयुक्त ठरतात. आधुनिक औषधशास्त्रात या संयुगांचा उपयोग दमा, वेदनाशामक औषधे, शस्त्रक्रियेमधील भूल आणि काही न्यूरोलॉजिकल विकारांमध्ये केला जातो.

फार्माकॉलॉजिकल सिद्धांत “The dose makes the poison” या संकल्पनेला अधोरेखित करतो, जो शिवतत्त्वाशी सुसंगत आहे, कारण शिव विषाचा नाश करीत नाहीत, तर त्यावर संयमित नियंत्रण ठेवतात. महाशिवरात्रीशी संबंधित उपवास, जागरण आणि ध्यान या परंपरेचा आधुनिक विज्ञानाशी सुसंगत अभ्यास केला असता अनेक रोचक निष्कर्ष दिसतात. उपवासामुळे ‘ऑटोफॅजी’ ही जैविक प्रक्रिया सक्रिय होते, ज्यामध्ये पेशी स्वतःतील निकामी घटक नष्ट करतात. यामुळे पेशींचे आरोग्य सुधारते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. ध्यानामुळे मेंदूतील अल्फा आणि थीटा वेव्ह्स वाढतात, ज्यामुळे मानसिक स्थैर्य , एकाग्रता आणि तणाव नियंत्रणात मदत होते. जागरणामुळे सर्केडियन रिदमचे पुनर्संयोजन होऊ शकते, जे आधुनिक क्रोनोबायोलॉजीमध्ये महत्त्वाचे मानले जाते. या सर्व वैज्ञानिक तथ्यांवरून स्पष्ट होते की प्राचीन भारतीय धार्मिक परंपरा आणि आधुनिक न्यूरोसायन्स, सेल बायोलॉजी यामध्ये घनिष्ठ संबंध आहे.
समीक्षात्मक दृष्टिकोनातून पाहिले असता बेल आणि धोतरा या दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या वनस्पती प्रत्यक्षात शिवतत्त्वातील संतुलन स्पष्ट करतात. बेल सात्त्विक शुद्धतेचे प्रतीक आहे, तर धोतरा तामसिक शक्तीचे. शिव या दोन्हींचा स्वीकार करतात, कारण जीवनात केवळ सकारात्मकतेपेक्षा संतुलन अधिक महत्त्वाचे आहे. आधुनिक विज्ञानही आज “होमियोस्टॅसिस” या संकल्पनेवर भर देते, जी शरीरातील संतुलन राखण्यावर आधारित आहे. निष्कर्षतः असे म्हणता येईल की महाशिवरात्रि, बेल आणि धोतरा यांचा अभ्यास केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक चौकटीत न करता, तो बहुविषयक (interdisciplinary) दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. आयुर्वेद, आधुनिक फार्माकॉलॉजी, पर्यावरणशास्त्र आणि न्यूरोसायन्स या सर्व क्षेत्रांमध्ये ह्या परंपरेचे वज्ञानिैक प्रतिबिंब दिसून येते त्यामुळे महाशिवरात्र हा सण अंधश्रद्धेचा नव्हे, तर प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिक विवेकाचा उत्सव म्हणून पाहिला जाऊ शकतो. शिवतत्त्व आपल्याला शिकवते की निसर्ग, विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परवि रोधी नसून, एकाच सत्याचे वेगवेगळे परिमाण आहेत. बेल आणि धोतरा यांच्या उपयोगातून जीवनात संतुलन, संयम आणि विवेक यांचे महत्व स्पष्ट होते, जे आधुनिक काळातील जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
हर हर महादेव!

(लेखक शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रिंसिपल बी व्ही भिडे फॉउंडेशन येथे प्रशिक्षण उपक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)




Comments