अहिल्यादेवी होळकर यांचे जलव्यवस्थापन - पंकज भोसले
- Apr 11, 2025
- 4 min read
Updated: May 27, 2025

मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्याअहिल्यादेवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्व श्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात. पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे.

मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात. पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे.
मनुष्य जीवनात पाणी ही अत्यंत मूलभूत गरज आहे, यासाठी मनुष्याने पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.मध्ययुगीन काळात जलव्यवस्थापनाला व जलसाठवणूक करण्याकडे विशेष लक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुरातन लेणी मधील खोदीव दगडांमधील पाण्याचे टाक हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.अनेक लेण्यांमधील या टाक्या लोकवर्गणीतून बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याबद्दलचे शिलालेख आजही तिथे आपण पाहू शकतो. पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी, पाण्याचे वितरण आणि वापराची योग्य योजना करणे आवश्यक असते हे सर्व बऱ्याच काळापासून भारतात चालत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेक गड किल्ल्यांच्या निर्मिती तेथील पाण्याचा साठ पाहून केली. शिवरायांनी केलेला एक उल्लेख म्हणजे “गडावर उदक पाहून गड बांधावा”. आजही अनेक किल्ल्यांवरील हेच पाण्याचे जिवंत स्त्रोत सर्व पर्यटकांची तहान भागवत आहे. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पाणी टंचाई भासणार नाही याची योग्य दक्षता घेतली जात असे. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आणि हि शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. “शेतकरी सुखी तर प्रजा सुखी प्रजा सुखी तर राजा सुखी” याकरिता राजाने शेतीविषयक धोरणाकडे जास्ती लक्ष दिले पाहिजे जेणेकरून राज्याचा महसूल वाढत जाईल. छत्रपती शिवरायांनी याकरिता तळी, पाटबंधारे, तलाव बांधून प्रजेला पाण्याची योग्य व्यवस्था करून दिली.
मराठ्यांच्या राजवटीत जलव्यवस्थापनासाठी एक मोठं योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात. पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. अहिल्यादेवी या मुळातच धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांच्या मुद्रेवर देखील ‘श्री शंकर आज्ञेवरून’ असे लिहिले असून त्यांच्या कारकिर्दीत अनेक शिवमंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. नर्मदेच्या किनारी वसलेल्या महेश्वरच्या राजयोगीनीने अखंड भारतभर प्रत्येक भाविकाची तृषा भागवण्यासाठी ठिकठिकाणी तलाव, आड, विहिरी, बारव, कुंड बांधून पाण्याची सोय केली. नाशिक मधील रामकुंडाचा जिर्णोद्धार करण्याचा आदेश दिला अश्या प्रकारची पत्र उपलब्ध आहेत. सन १७८८ मधील पत्रात राजश्री यशवंतराव गंगाधर गोसावी यांना उद्देशून त्या लिहितात “विशेष जनेस्थानी श्रीरामकुंड आहे त्याचा जिर्णोद्धार इकडून करावा हे मानस यास्तव हे पत्र तुम्हास लेखन केले”. आपल्या संस्कृतीचे पुनरुत्थान करण्यासाठी अग्रस्थानी असणाऱ्या राज्यकर्त्यां म्हणजे अहिल्यादेवी होळकर.
शैवपरंपरेत काशीचा तीर्थक्षेत्राचे मोठे महत्त्व आहे. औरंगजेबाच्या काळात काशी विश्वेश्वराचे मंदिर हे फोडण्यात आले होते त्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि काशी नगरीचा संपूर्ण कायापालट हा अहिल्यादेवींनी केला. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार देखील अहिल्यादेवींनी केला. त्याचबरोबर या घृष्णेश्वराच्या मंदिरा जवळच अर्धा किमी अंतरावर ‘शिवतीर्थ’ या नावाने प्रसिद्ध अशी बारव आहे त्या पवित्र बारवेचा जिर्णोद्धारही केला. ही बारव अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य स्वरूपाची आहे. सात टप्प्यात असणाऱ्या या बारवेला संरक्षक तटबंदी असून बारावीच्या चारी कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी कोणाडे आणि माणसाना वस्त्र बदलण्यासाठीच्या खोल्या ह्या आहेत. या बारावीच्या प्रत्येक बाजूस ५६ पायऱ्या असून पूर्वेच्या बाजूला एक महत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे. या लेखांमध्ये नमूद केलेल्या तिथीची इंग्रजी दिनांक ७ फेब्रुवारी १७७० येते, लेख पुढील प्रमाणे
श्री शके १६९१ विरोधी संवत्सरी माघ सुदी
ना ग बुध दिनी होळकर कुलाल वा
लकल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री
तीर्थराज शिवालयाचा जिर्णोद्धा
र केला असे श्री रस्तु शिवम कल्प
हिंदू धर्मशस्त्राप्रमाणे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे हे अत्यंत पुण्यप्रद आणि परोपकारी मानले गेले आहे. तलावाचे पाणी पिऊन प्रत्येक जीवप्राणी तृप्त होते, जो असे पाण्याचे स्त्रोत बांधतो त्याच्या सात कुळाचा उद्धार होतो धर्मकार्य करताना अहिल्यादेवींनी घृष्णेश्वरा सारख्या अनेक बारवा, विहिरी या वेगवेगळ्या ठिकाणी बांधल्या आहेत त्या मध्ये शंभू खांबे निमगाव (नाशिक), पिंपळस (नाशिक), साखरगाव (निफाड), ओझर (नगर), वाफगाव (पुणे), चांदवड येथील रंग महाल (नाशिक) यासारख्या ठिकाणी देखील अहिल्यादेवींनी बारवा व विहिरी बांधून पाण्याची सोय प्रेजेला करून दिली.
अश्याच प्रकारची वैशिष्ठ्यपूर्ण विहीर आपल्याला कसारा घाटात पाहायला मिळते. गोल घुमटाच्या आकाराच्या कसारा घाटातील हि विहीर जवळपास 35 फूट व्यासाची आहे. या विहिरचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपले लक्ष वेधून घेते. टोपली सारखे अच्छादन केलेली ही विहीर तेथील वसाहतीला थंडगार पाण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे. या विशिष्ट रचणे मुळे विहीतील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि पाण्याचा स्तर उन्हाळ्यात देखील टिकून राहतो. डोंगराच्या वरच्या बाजूला चार वसहती म्हणजे छोटी गावे आहेत या गावातील गावकरी याच पाण्याचा वापर करतात. जुन्या काळामध्ये कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूना या घाटामध्ये विश्रांती मिळावी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्ध वर्तुळाकार इग्लूच्या आकाराचे केलेले वैशिष्ठ्यपूर्ण दगडी बांधकाम हे अहिल्यादेवी यांच्या कालखंडात झाले आहे. विहीरी मध्ये कचरा अथवा जंगली प्राणी पडू नये याची खबरदारी म्हणून अश्या प्रकारचे बांधकाम केले आहे. कडक उन्हाळा असलेल्या भागात तेथील भौगोलिक रचणेचा अभ्यास करून अश्या प्रकारच्या विहिरी अहिल्यादेवी यांनी बांधल्या, हे पण एक आश्चर्यच आहे.
केदारनाथ इथे असलेलं कुंड जमिनीपासुन ३०० फूट उंच आहे. मुळात केदारनाथ सरख्या इतक्या उंचीवर, आजही खडतर प्रवास असलेल्या ठिकाणी बांधकाम साहित्य नेणं हेच किती जिकिरीचं काम त्यात तिथे इतक्या उंच ठिकाणी भक्कम हौद बांधणं हे त्याहून अवघड काम अहिल्यादेवींनी उत्तम प्रकारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यात्रेकरूंची स्नान संध्याची आणि दळणवळणाची तसेच तिर्थाटनाला जाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवींनी भारतातील अनेक पवित्र नद्यांवर घाट बांधले आहेत. बनारस मध्ये दशाश्वमेध घाट, महिलांसाठी विशेष असा मनकर्णिका घाट, अयोध्येमध्ये शरयू घाट, हरिद्वार मध्ये कुशावर्त घाट, मथुरा येथे कालिया देह घाट, प्रयाग व मंडलेश्वर येथे घाट बांधले. दंडिया येथे नर्मदा नदीवर घाट, चौंडी येथे बिना नदीवर घाट, पुणतांबे येथे गोदावरी नदीवर, कुरुक्षेत्र येथे संमत कुंडावर, लक्ष्मी कुंडावर घाट बांधले. अहिल्यादेवींनी सर्वात जास्त घाट हे महेश्वर येथे बांधले. त्यामध्ये अहिल्या घाट, राजराजेश्वर घाट, काशी विश्वेश्वर घाट, सांडबुवा घाट, गवळी घाट, भागीरथी साहेब घाट, सालुमा साहेब घाट, गंगादिन घाट, जमादार घाट, नायक घाट, लक्ष्मीबाई साहेब घाट, टिकाराम जमादार घाट, मातंगेश्वर घाट, मगर घाट, नरसिंग टेकरी घाट, कुंदेश्वर घाट, पंचपेढी घाट, चौथा भानू घाट, इत्यादी घाट बांधले. अहिल्यादेवींनी ही सर्व धर्म कृत्ये आपल्या खाजगी खजिन्यातून केली.
अहिल्यादेवींनी बांधलेल्या सर्व प्रकारच्या विहिरी, बारव, कुप महाराष्ट्रासह भारतभरात विविध ठिकाणी दिसतात. पायऱ्या असलेल्या विहिरी (स्टेपवेल) पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणून काम करत असत, वाहून जाणार्या पाण्याची साठवणूक करून ते पाणी भूजलात झिरपू देत असत, ज्यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर तेथील नैसर्गिक स्त्रोतामुळे जिवंत ठेवण्यास मदत होत असे, त्यामुळे कोरड्या हंगामात देखील पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होत असे. पावसाचे पाणी साठवून, पायऱ्यांच्या विहिरींनी भूजल पातळी पुन्हा भरण्यास मदत केली, ज्यामुळे भविष्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा झाला. भौगोलिक रचनेचा उत्तम अभ्यास करून त्या रचनेला उपयुक्त असे बांधकाम अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळात झालेले आपल्याला पाहायला मिळते. दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये त्यांनी बांधलेल्या पायऱ्यांच्या विहिरी त्यांच्या व्यावहारिक जल व्यवस्थापनासाठी, स्थापत्य सौंदर्यासाठी आणि सांस्कृतिक उत्क्रांतीसाठी महत्त्वाच्या आहेत. कोरड्या विभागात त्यांनी विश्वासार्ह पाण्याचा स्रोत पुरवला, सामुदायिक एकत्र येण्याची ठिकाणे म्हणून काम केले आणि त्या काळातील समृद्ध स्थापत्य आणि कलात्मक परंपरांचे प्रतिबिंब पाडले.
(लेखक – इतिहास संशोधक, प्राचीन खेळांचे संकलक व त्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत.)

Comments